चिलयपाटी
जेंव्हा सगळीकडे हिरवेगार असेल आणि सगळे मस्त असेल तेंव्हा ह्या खेळाचा मौसम सुरु होतो. यात सगळेच आले. गाई-म्हशी , गुरे-ढोरे , शेळ्या आणि खिल्लारे जेंव्हा खाऊन मस्त असतात आणि निमुटपणे चरतात तेंव्हा सगळी ढोरकी , गुराखी आणि शाळकरी मुले , गुरांना नदीत सोडून आणि शाळेला बुट्टी मारून किंवा खेळायच्या तासाला निवांत मनाने हा खेळ खेळू शकतात. मस्त श्रावणातला पाउस , रात्रभर पडून जमीन तृप्त झालेली असते आणि जेंव्हा रानात काही काम नसते , जेंव्हा शेतातही वाफ नसते तेंव्हा हा खेळ सुरु होतो गावाच्या पानढरीत... याला काही लागत नाही फ़क़्त मस्तवालपणा असावा लागतो अंगात वारा पिवून उधळणाऱ्या खोंडा सारखा. आणि कुणावर तरी मचकायची खुमखुमी. रान डुकरा सारखी धडस आणि गेंड्या सारखी थोपवायची ताकद. माकडासारखा आगाऊपण आणि गाढवा सारख्या लाथा मारायच्या असतात. हरिणाचा चपळपण आणि कांगारूची उंच उडी. असे सगळे जेंव्हा एकत्र येतात आणि जमीन असते निसरडी आणि लोण्यासारखी मऊ तेंव्हा हा खेळ सजतो. ज्यांनी तो खेळला आहे ते भाग्यवान कारण तो आता काळाच्या ओघात गडप झालाय त्याचा काही मागमूस लागत नाही , कुठून आला आणि कोणी आणला , इतर कुठेही मी त...