एसटी



मला मी कधी एसटीबद्दल सांगेन असे झाले आहे. आम्ही गावात शिकत असतांना आयुष्य हे कसे निवांत होते , प्रत्येकाजवळ वेळच वेळ होता. वाहनांचे प्रकार म्हणजे गाडी बैल,एसटी आणि ट्रॅक्टर. ज्यांनी २५-३० किलोमीटर गाडी बैल ने प्रवास केला आहे त्यांना कुठल्याही वाहन प्रकाराचे महत्व हे वाटणारच. तर जेंव्हा एसटी सुद्धा नव्हती तेंवा तालुक्याच्या गावावरून जाणारी भुसावळ-मुंबई प्यासिंजर जी सकाळी ११ वाजता असायची तिला गाठण्यासाठी आम्ही गाडीबेल ने सकाळी ३ वाजता घरून निघायचो. गाडी बैल वरचे कडब्याचे कुशन , पितळीचा तांब्या, ट्रंक, धान्याचे बाचके, डाळी साळी, केळीचा घोडा, भुईमुगाच्या शेंगा. सगळे पुढे सरकून बसायचे कारण गाडी उरळ यायची ( मागे जर वजन जास्त झाले तर बैलांना फास लागायचा जोत्यांचा (बैलाला दुश्यार ला यानेच जुंपले जायचे). सडक म्हणजे माती आणि जाड्या भरड्या न दबलेल्या खडीचा पसरलेला समुदाय. रस्त्याला भविष्यातील कामासाठी टाकून ठेवलेले खडीचे ढिगारे वर्षानुवर्ष आपली कर्मकथा सांगत राहायचे. रस्ते हि जीवनावश्यक बाब तेंव्हाही नव्हती आणि आजही ती कुणाला वाटत नाही. तर अशा रस्त्यांवरून उद्ळत चालणारे वाहन, खूप लांबपर्यंत त्याचा आवाज एकू यायचा. गाडी बैल चा एकसुरी चाकोरीचा आवाज , ब्रम्ह मुहूर्ताची निरव शांतता , आईच्या माडीवर झोपून पाहिलेलेल लक्ख तारकांचे आकाश. डोळ्यात झोप आणि मित्रांपासून लांब जात असल्याची विरहाची एक अनाहूत संवेदना. दूरवर दिवे दिसले कि गाव येत असल्याची जाणीव आणि जसे जसे जवळ आले कि तेच पेंगुळलेले रस्ते. रस्त्यातले सगळे गाव पेंगत असायचे , जसे जसे तालुक्याचे गाव जवळ यायचे तसे तसे उजाडत जायचे, दूरवर दिसणारा पहिला शुक आणि नंतर येणारा दुसरा शुक पूर्वेला दिसायचा- गाडीवान बोलत राहायचा खूप गोष्टी सांगायचा.
तर असा हा प्रवास शरीरासाठी सुखकारक केला एसटी ने. वेळ वाचला पण त्यात गाडीवान,तारकांनी भरलेले आभाळ, बैलांचे मंजुळ गण हरविले.
आमच्या गावावरून सकाळी ६,,११, दुपारी फिरणारी ४ ची आणि शेवटची ५ ची अशा वेळांच्या गाड्या जळगाव किंवा पाचोरा जायच्या. म्हणजे असे होते कि पाचोरा आणि जळगाव हि शेवटची ठिकाणे. पाचोरा वरून निघतांना पाचोरा-कुऱ्हाड-जळगाव ही पाटी उलट्या बाजूने म्हणजे जळगाव वरून निघताना जळगाव-कुऱ्हाड-पाचोरा असायची. आता गंमत म्हणजे ह्या दोन मोठ्या गावांना जोडणारे दोन रस्ते आहेत. आमचा रस्ता कुऱ्हाड मार्गे आणि दुसरा सामनेर मार्गे. आमच्या रस्त्याला २-३ तास लागत तर दुसरा २ तासात एका बाजूचे अंतर पूर्ण कायचा. आमचा रस्ता खडीचा तर सामनेर मार्गे जाणारी एसटी राज्य मार्गावरून म्हणजे त्यातल्या त्यात बर्या (जिथे डांबरी करणाच्या खुणा असत असा) रस्त्यावरून जायची. कुणी नवखा चुकून हमखास आमच्या बस मध्ये बसायचाच त्याला डेपोतून १-२ किलोमीटर आल्यावर ज्ञान व्हायचे कि आपण भलत्याच मार्गाने जात आहोत. मग काय वेग वेगळे अनाहूत सल्ल्यांचे पिक यायचे. भाऊ तुम्ही असे करा बिल्दी पर्यंत ह्या एसटी ने चला मग उतरून दुसऱ्या बस ने या. हा सल्ला पाचोर्याहून निघणार्या बस साठी ठीक होता पण जळगाव वरून मात्र दोघाही रस्त्यांचा असा समान मार्ग नव्हता. एकदा पाहुणा बसला कि मग काय , त्याला या मार्गाशिवाय मुक्ती नाही. अशावेळी उगीच त्याला आठवण करून द्यायची कि तू किती मूर्ख आहे आणि कसा चुकीच्या रस्त्याने चालला आहे. बर इकडून भाडे अधिक, वेळ अधिक, रस्ता खराब.
बस हलत डुलत हेलकावे खात ताशी ३०-४० किलोमीटर च्या वेगाने फारतर प्रवास करायची. लहानपणी बसचे फारसे कौतुक नव्हते कारण आमच्या सगळ्या गरजा आमच्या आणी शेजारच्या गावात पूर्ण व्हायच्या. मावशीकडे जामनेर ला किंवा औरंगाबाद जाण्यासाठी पहूर ला जावे लागायचे तेंवा ट्रक्टर-ट्रोली पुरेशा असायच्या. आम्ही शासनावर कुठल्याही बाबतीत अवलंबून नव्हतो. "प्रवाशांच्या सेवेसाठी" "राज्य परिवहन" अशी गोंडस बाळबोध वाक्ये लेऊन ती यायची. लांबून आवाज यायचा कारण तिकडे डेपोवाले सगळ्या म्हातार्या बसेस पाठवायचे. खाडखाड, धडधड, वेगवेगळ्या पार्टचे आवाज , रस्त्याच्या चढ उतारानुसार येणारे वेगवेगळे इंजिनाचे आवाज, पहिला-दुसरा-तिसरा-चवथा अशी चढ्या क्रमांकाची गेरची दटावणी कानाला त्या मेक्यानिक पेक्षा जास्त सांगायची, ती बस बोलायची. लांबूनच तिचा आवाज यायचा तसे आम्ही बस निवारा कडे धाव घ्यायचो. बस निवारा म्हणजे एक सर्वानुमते (कुणाच्या ते माहित नाही) ठरलेली एक जागा जिथे बस उभी राहणार. बसच्या मार्गाला गावात जाणारा छेदन रस्ता असा हा थांबा बहुतेक सगळ्याच गावांचा असायचा. धूळ-फुफाटा उडवत ती थांबली कि उतारुना प्रथम नियमा प्रमाणे उतरू द्यायचे कारण ते उतरले नाही तर उभे कुठे राहणार इतकी ती भरलेली असायची. 

ए मावशी बाजूला कर कि तुझा भाजीपाला?
भाजीवाली - "डोक्यावर ठिऊ कि काय ?" 
माग जाऊन बस कि , इकडे कशाला मध्येच रस्त्यात ठेवले ते पोते 
आरे बाबा पुढच्या गावाला तर उतरायचे आहे, कशाला माग न पुढे. जा कि वलांडून 

पाय ठेवायला जागा मिळाली कि, आरे ते झोपाटे व्हडा कि कुणीतरी बाहेरून मग सगळ्या प्रवाशांना कापसा सारखे दाबून बाहेरून कुणीतरी दार बंद करायचा. आमच्यापैकी कुणीतरी डबल बेल मारलेली असायची - अरे चला हो. पेपर आहे आमचा, आदुगरच लेट आहे तुम्ही. कंडक्टर चांगला असला तर ठीक नाहीतर त्याचा स्वाभिमान दुखावला जायचा- बेल मारणे हा त्याचा अधिकार. 

माणसांचे असेच असते, थोडासा अधिकार जरी मिळाला तरी तो गुर्मी दाखवतो किबहुना जाणीव करून देतो समोरच्याला कि तू गुमान बस, हे माझे काम आहे. साधा अपार्टमेन्ट चा सेक्युरीटी सुद्धा तुम्हाला नाव, नंबर, पत्ता , भेटायला जाणार्याचे नाव, कारण, त्याचा फ्ल्याट नंबर लिहिल्याशिवाय जाऊ देत नाही. 

आता जिकीरीचे काम म्हणजे तिकीट काढणे. कंडक्टर बहुधा त्याच मार्गाचे असल्यामुळे ओळखीचे असायचे मग काय मागच्या सगळ्यांचे तिकीटाचे पैसे आणि ठिकाण हस्ते-परहस्ते पुढे पोहोचायचे. २-रोटवद , १ मोहाडी , दीड नेरी ( आता हा अर्धा कोण, बघू बाळ कितव्या वर्गात जातोस तू ? बाळ घरापासून तर ह्या क्षणापर्यंत १००० वेळा मनात उजळणी करून जरी आला तरी अड्खळत वय सांगायचा. मग काय हुज्जत सुरु व्हायची आणि शेवटी बहुतेक कंडक्टर माघार घेऊन अर्धा तिकीट द्यायचा ) एकीकडे धर्म संकट - एकी कडे भीड असे हे नेहमीचेच. बहुतेक सुट्टया पैशांची मारामारी असायची. ७-८ रुपये तिकिटात ४ आने ८-आणे खूप महत्व ठेवायचे. उतरताना घ्या मावशी असे सांगून तिकिटामागे रक्कम लिहिलेली असायची. मावशी विसरली तर पैसे कंडक्टरचे. मार्गावर बस ५ मिनिटा पेक्षा जास्त थांबली तर समजायचे कि ती २५ मिनिटे थांबणार मग आपण पण उतरून चहा-पान करून यायचे. ह्या क्षणाला ड्रायव्हर आणि कंडक्टर बाजूच्या धूर ओकणाऱ्या कडूबा रेस्तारांत बसून गप्पा मारत असतांना दिसायचे. त्यांना चला म्हणन्या इतकी सुद्धा हक्काची जाणीव एकही मनात उगवलेली नव्हती. अजूनही नाही. कधी ड्रायव्हर डब्बा घेऊन त्याचा मुलगा येणार त्याची वाट पहायचा. बस बहुधा डांबरी सडकेवर आलेली असायची कारण अशी चहाचे दुकान तिथेच सापडायचे. गावाकडून जळगावला जातांना ३-४ गिअर मध्ये मग एकदा ड्रायव्हरने बस टाकली कि खिडकीचा गार वारा सुखद वाटायचा. मन धाव घ्यायचे, विचार चक्र सुरु व्हायचे. 
"मेरे पी को पवन किस गली ले चली ?" घर सोडत असतांनाच त्रास. भावनांचे बंधन आणि कर्तव्याची कुऱ्हाड एकाच वेळी चालायची. आपलेच मन असे भांडतांना पाहून डोळे भरायचे. "भावनेपेक्षा कर्तव्य कधीही श्रेष्ठ असते" ह्या ब्रीद वाक्यावर आपली गाडी अशी चालायची कि दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीला सुद्धा मी गाव सोडलेला आहे. त्या ग्रावीटीला  तोडायला लागणारे इंधन आपल्या रॉकेट मध्ये पुरेपूर होते. 

गावातून निघतांना बसचे प्रवासीही वेगवेगळ्या धाटणीचे आणि कलेचे असायचे. बसच्या वेळेनुसार वेगवेगळे प्रवासी भरले जायचे. अगदी सकाळी निघणारे (शाळा, कॉलेज, कोर्ट कचेरीच्या कामाने किंवा डॉक्टर कडे निघालेले असायचे) नंतरच्या बसेसला म्हणजे ८ ते ११ चे प्रवासी म्हणजे केळीच्या व्यापार्याकडे पैसे मागायला, शेतीसाठी लागणारे सामान आणायला. सकाळचा गुलाबी सिनेमा आणि मटन खायला जाणारी चैन करणारी मंडळी. काहीतर करमत नाही म्हणून शहरात जाणारी मंडळी. 
येतांना मात्र संध्याकाळची ४ ची बस पकडणे हे एक जिकीरीचे काम असायचे. हि बस कधी तिच्या फलाटावर न लागता कुठेतरी कोपर्यात लागायची. बस नंबर माहित असल्यामुळे पळत जाऊन चालत्या बसला मागून शिडी पकडून चढणे आणि "संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग मधून आत जायचे" एकदा डोळे बंद करून, मनात ४५-४७ चे तापमान आणा. लग्न सरायीची गर्दी, भट्टी सारखी तापलेली बस, पाण्यासाठी लाही लाही करणारा जीव, धुळीने भरलेले डोळे. आपण मागच्या खिडकीतून जाऊन जागा सांभाळायची. दोन च्या सीटवर तीन आणि तीन च्या सीटवर वर पाच बसलेले, मधल्या जागेत तीन रांगा लाऊन उभे राहिलेले प्रवासी (डावीकडची-उजवीकडची आणि मधली). टाटा ची बसच भारतात चालू शकते. प्रत्यक्ष क्षमतेच्या ५ पट ठासून भरलेली बस आणि मग दाबून दाबून लावलेली झोपाटे अगदी पायऱ्यांवर उभे राहणारे प्रवासी. या वेळी श्वास घेता येणे हीच मोठी सुखद कल्पना. मग कुणीतरी म्हातारबाबा आपण बसलेल्या जागेवर येणार, मनात धर्म अधर्माचे वादळ सुरुवात व्होणार आणि त्याची तब्येत पाहून आपण त्याला आपली जागा द्यायची. थोडा वेळ जाऊद्या आणि म्हातार बाबा शिल्गवणार उंट बिडी. हसावे कि रडावे. बर तेंव्हा हा passive smoking चा बाऊ नव्हता. तंबाखू चघळून निवांत पिंका टाकणे हे काही गैर नव्हते. गच्च भरलेली बस, घामात निथळणारे प्रवासी. बटाटा कसा उकडत असेल ह्याचा याची देही अनुभव. बाहेर नजर टाकायची तर

"नव्या नवरीला सांगायला लाजू नको मर्दा - तुझ्यापेक्षा प्यारा मला गाय छाप जर्दा" 

सगळी बस भरून झाल्यावर होणारी announcement "कुऱ्हाड मार्गे पाचोरा" जाणारी बस फलाट क्रमांक २ च्या समोर लावण्यात आलेली आहे याचा अर्थ आपल्या बस कडे नियंत्रकाचे लक्ष गेले आहे, डोळ्यात प्राण आणून येणाऱ्या प्रत्येक ड्रायव्हर कडे बघायचे. आणि मग तो बसच्या पुढच्या फाटकाचा उघडल्याचा सुखद आवाज. कंडक्टर खालून ओरडायचा अरे दार उघडा नाहीतर हि बस निघणार नाही अजून तासभर. गर्दी इतकी कि नव्या प्रवाश्यांना प्रतिबंध करण्यासाठी लावलेला दरवाजा आता कंडक्टर साठी उघडायचा. मग कोणीतरी आगाऊपणे मारलेली डबलबेल. इंजिन सुरु व्हायचा आवाज, गिअर टाकून जेंव्हा ती बस डेपो सोडायची तो आनंद उडणारी फ्लाईट नाही देऊ शकणार. शहराचे वेगवेगळे वास, जाहिरातीचे billboard मागे पडायचे. इतकी तापलेली हवा पण घामेजलेल्या अंगावर जणू अमृतवर्षा. तिकीट काढण्याचे तसेच सोपस्कार आणि कधीनवत मिळालेला डांबरी रस्ता - ड्रायव्हर दादा फुल जोमात. घरची-रानाची ओढ - मन आधीच पोहोचलेले असायचे गावाशिवारात. बस जशी गावाशेजारी यायची तसे आपल्या एरियात आलेल्या भाई सारखे वाटायचे. एकदा असे झाले कि एका बस चा ड्रायव्हर गावातील रमेश आणि कंडक्टर अमर. त्यांना कुणीतरी म्हटले कि,

"कर सब गाव्न्की बस गावम जाव आन आपली बस साळी गोठण पा उतार देव,
म्हणजे आपण काई दुसरी माई का है कि ? थम काई कामका है. या बस आपला गाव्तोडी गयाच पायजेल"  (कायरे सगळ्या गावांच्या बसेस त्यांच्या गावात जातात आणि आपली कशी बाहेर गोठाना वर सोडून निघून जाते ? म्हणजे आपण काय दुसऱ्या आईचे हाय कि काय ? तुमचा काय उपयोग आहे गावासाठी ? हि बस आज गावात गेलीच पाहिजे ) 

एकदा गावाचा अभिमान जागा झाला कि मग कसली चिंता नोकरीची. त्या दिवशी बस गावात आली सगळे नियम धाब्यावर बसवून. गावाचे एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येकाच्या मनात पांढरी विषयी आदर आहे. इथे सगळे समान, खेळ संपला कि बुद्धिबळातील सोंगट्या एकाच डब्ब्यात जाणार तसे सगळे एकाच मसणात जाणार याची जाणीव घट्ट आहे. इथे कुणी उगीच उडत नाही आणि उडला तरी त्याचा फुगा फोडणारी मंडळी खूप आहेत. 

गावाला येणारा दुसरा रस्ता म्हणजे फाटावरचा, हा रस्ता प्रत्येक गावाला असतो. म्हणजे जर दुसरी एखादी सडक त्या गावाच्या शिवारातून जात असेल तर शिवाराच्या पान्दीला जिथे रस्ता छेदतो तो त्या गावाचा फाटा. लोहारा - जामनेर ह्या बसच्या मार्गावर एक कासमपुरा फाटा आहे. फाटा थांबा म्हणजे एखादे आंब्याचे झाड किंवा लिंबाचे झाड. दिवसातून २-४ वेळा येणारी बस फक्त तिच्या आवाजावरून ओळखावी. हा रस्ता शेताचा असल्यामुळे इकडे उन्हाळ्यात फुफाट्या चे साम्राज्य. घोट्या भर पाय बुडेल इतका शुद्ध फुफाटा. तो इतका तापलेला असे कि निखार्यावरून चालण्याचा भास व्हायचा आणि पावसाळ्यात त्याचा गुडगा भर चिखल होणार असा हा रस्ता. ह्या रस्त्याने पावसाळ्यात चप्पल-जोडे हातात घेऊनच चालावे लागायचे इकडे ट्रक्टर सुद्धा चिखलात फसणार. जर पावसाला उघडीप मिळाली तर ३-४ दिवसांनी पडलेल्या पायवाटेवरून चालता यायचे. बसची वेळ हि नावाला होती, तिकडे जाऊन बसायचे गप्प गुमान - शेताची हवा खायची, ती येणार तिच्या हिशोबाने, आली कि चढायचे इतकेच. परगावाहून आलेल्या पाहुण्याची मात्र इकडे फजिती होणार, म्हणजे त्याची अपेक्षा गावात शिरायची आणि इकडे कमीतकमी २ किलोमीटर उन्हातान्हात किंवा चिखलात चालावे लागणार. दर वेळेला तिथे कोणी असेलच याची खात्री नाही मग बघावी वाट कुणी येतोय घ्यायला कि नाही ते ? बर बसची वेळाही नमूद नाही कसे यावे घ्यायला येणार्याने ? मला मात्र हा रस्ता अधिक आवडायचा कारण इथे रानाचा वारा , शेताचा वास , बंधाऱ्याचे गवत आणि कधी भट्टी सारखे तापलेले काळे रखरखीत आणि रणरणते नागरलेले शेत. सावलीला झाड नाही आणि उडणारे फुफाट्या चे लोट. रानभर उडणार्या भवरी. चालता चालता डोक्याची सावली पायात पडणार, कुठेही प्यायला पाणी नाही, कासावीस झालेला जीव आणि तगमग करणारी सृष्टी. जीवनाच्या छटा रस्त्यात दिसणार. पावसाळ्यात नवचैतन्याने न्हालेले शेत, हिवाळ्यात कसे बाळसे धरलेल्या बाळंतीनी सारखे दिसते. जीवनाचे ऋतू आत आणि बाहेर सारखेच, सत्य इतके कि सगळे अनित्य. 

ह्या रस्त्याने मग पावसाळ्यात केळीचा ट्रक येणार , रस्त्याचा अंदाज न आल्याने तो नक्कीच फसणार त्याला ओढायला गेलेला ट्रक्टर सुद्धा फसणार, त्याला ओढायला जाणारा दुसरा ट्रक्टर हि फसणार. हि सगळी फजिती म्हणजे आम्हा मुलांची IPL. सकाळ ते रात्र मग त्यांना काढण्यासाठी सगळे आकाश-पाताळ एक करणार. गावात प्रत्येक दिवशी काहीतरी घडते, शहरासारखे एकसुरी ते कधीच नसते. इकडून कधी बस येऊ शकली नाही. वरातीच्या बसेस गावातूनच येतात. आता हे फाट्याचे ठिकाण बदलले आहे. त्याचे असे झाले कि, ८-१५ वर्षापूर्वी अमळनेर कडून कोणीतरी फकीर आला त्याने अगदी योग्य ठिकाणी म्हणजे चौरस्त्यावर आपली झोपडी बांधली. स्वताला कुठलातरी सय्यद बाबा म्हणून घोषित केले. एक हिरवा झेंडा लावला आणि गुरवारी दरबार सुरु केला. उजाड गावाचा ओसाड रस्ता जिथे कुत्रेही फिरकत नव्हते ५-६ वर्षात पार बदलून गेला. कुणाच्या अंगातील भुते उतरविणे, कुणाचे मानसिक आजार काढणे, कुणाला तायीत , कुणाला बाबाची उदी. शिष्य गण वाढला. माझ्या डोळ्यासमोर जिथे काहीच नव्हते तिथे एक उरूस भरतो, बाबा गेले त्याच्या चेल्याची Quanto आहे. आता तिथे नेहमी वर्दळ असते आणि बसचा थांबाही सोयीप्रमाणे तिकडे सरकला आहे. सगळा बाजार झाला तिथे आतल्या भितीचाही बाजार झाला आहेच कि. सोई आणि ऐपती प्रमाणे लोक काम धाम सोडून पैसे खर्च करून मनशांती साठी जवळच्या बाबाकडे जातात नाहीतर लांबच्या बाबा कडे... आता बहुतेकांकडे स्वत:च्या 2-3 मोटर सायकली किंवा कार आहेत, बसची वाट पहाण्या इतपत कुणाला दम धीर नाही. बैल गाडीपासून सुरू झालेला जीवनाचा वेग, वाढत वाढत सगळ्यांना ओलांडून मोबाइल च्या व्हाटसप्प पलीकडे गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला पायाखालची जमीन कळतच नाही. पाय जमिनीवर नाही आणि मन असे अधांतरी, कुठलाच आनंद टिकत नाही. वेळ वाचवूनही हातात काही राहत नाही घट्ट मुठीतल्या वाळू सारखे सगळे गळून पडते आहे. 1000 च्या वर फेसबुक आणि व्हाटसप्प चे मित्र आहेत पण खांद्यावर डोके ठेवून रडण्यासाठी एकपण नाही. वेळ भरपूर आहे आणि खायला उठतो आहे. असे वाटते जीवनाचा वेग कमी असलेलच बरा .. सुविधा नसल्या तरी निदान आनंद तरी असतो.  

Comments

Popular posts from this blog

चिलयपाटी

नदी

मसनखडी आणि चुनीलाल गवळी

देवमाणूस

नाना

नांगरणी

मराठी मुलांची शाळा, कासमपुरे

मनोगत

ओळख